शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

🌸🌺🌹 बसंत है आया रंगीला 🌷🌻🥀

 


कडाक्याच्या थंडीत डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन झोपलं असताना अचानक एके दिवशी पाहटे कोकिळेची कुहूकुहू ऐकून जाग येते आणि एका क्षणात मनावरची मरगळ नाहीशी होते ...

मन हरखून जातं … वसंताच स्वागत करायला अधिरतेने तयार होतं आणि दबक्या पावलांनी येणार्‍या वसंताच्या खुणा जिथे तिथे शोधू लागतं .


नुसत्या वसंताच्या आगमनाच्या चाहुलीनेच अंगावर रोमांच फुलून येतो ....

आजूबाजूला पाहतो तो काय ! निसर्ग देखील आळोखे पिळोखे देत जागा होऊ लागलेला असतो . खिडकी समोरचा गुलमोहर बहरू लागलेला असतो .


जवळच एखाद्या आम्रवृक्षाचा मोहर आपल्या गोड दरवळाने वेडपिसं करू लागलेला असतो . पानगळी मुळे निष्पर्ण झालेले वृक्ष परत एकदा अंगभर इवल्या इवल्या लाल पिवळ्या पोपटी रंगांची पालवी मिरवायला लागलेले असतात . झाडे रंगीबेरंगी फुलांनी आसुसून बहरतात .


“ केतकी गुलाब जूही चम्पकबन फूले

रितु बसन्त अपनो कन्त , गोदी गरवा लगाय

झुलना में बैठ आज पी के संग झूले

केतकी गुलाब जूही चम्पकबन फूले ..... “


मऊ हिरवे सोनेरी वस्त्र ल्यायलेली वसुधा अबोध अल्लड युवतीप्रमाणे सजलेली असते. आसमंतात सगळीकडे फुला फळांचा मधुर दरवळ सुटतो .

त्या सुवासाने मदमस्त झालेले भुंगे आणि मधमाशा फुलाफुलांवर दाटी करतात. नाजूक साजूक रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून तिकडे बागडू लागतात .


पाहावं तिथे लाल , गुलाबी , निळ्या , पिवळ्या रंगांची उधळण दिसते . कोकिळेला साथ द्यायला म्हणून इतर पक्षी देखील मंजुळ स्वरात किलबिलाट करू लागतात .

सगळेच वसंताचं जंगी स्वागत करायला सज्ज झालेले असतात .....


“ कुहु-कुहु बोले कोयलिया

कुंज-कुंज में भँवरे डोलें

गुन-गुन बोलें ...

सज सिंगार ऋतु आई बसंती

जैसे नार कोई हो रसवंती”


असा हा वसंत ....

अगदी प्राचीन काळापासून सर्वांचाच आवडता ऋतू आहे .

त्याच्या नुसत्या उल्लेखानेच अंग रोमांचित होत , तनामनातून एक गोड शिरशिरी धावू लागते .


“ झूम रहा है रोम रोम क्यूँ

  तन मन लहराया

  थिरक रहा है अंग अंग क्यो

  कौन आज आया

  राजन , कौन आज आया ... “


समस्त सृष्टी त्याच्या स्वागतासाठी नटून थटून तयार झालेली असते . सगळीकडे हर्षकल्लोळ माजलेला असतो ....

अशाप्रकारे अगदी राजेशाही थाटात पदार्पण करणाऱ्या वसंत ऋतूचा दिमाखच काही आगळा असतो ....


उगाचंच क्या त्याला ऋतुराज म्हटले आहे ?

सहाही ऋतूंचा अनभिषिक्त राजा .....

इतर सर्व राजा महाराजांची एका क्षणात सुट्टी करणारा ..... त्याच्या स्वागताला , त्याला रिझवायला नृत्य गायन हवेच .


“ राजन कौन , कौन महाराजन

कौन आज दुष्यंत

स्वागत करो आज आए हैं

श्री ऋतु राज बसंत

बसंत है आया रंगीला , बसंत है आया

मन की कोकिला लगी चहकने

आज साँस भी लगी महकने

मधुमदमाती अंग अंग में नया रंग छाया "


वसंतात फुलणाऱ्या प्रत्येक फुलाबरोबर , पाकळीबरोबर माणसाचे कोमल रसिक मन देखील उमलत जाते . वसंताच्या प्रभावामुळे धुंद मदमस्त होऊन गाऊ लागते .

उत्तम राजाची लक्षणे काय असावीत ?

आपली प्रजा आपल्यावर जेवढं प्रेम करते तितकीच प्रजेची काळजी त्यानेही घेतली पाहिजे .


 म्हणूनच तर ज्या वसुंधरेने त्याला भेटायला एवढ्या उत्सुकतेने साज शृंगार केला आहे तिला हसवणं , तिचा साज कायम ठेवून तिचं सौंदर्य खुलवणं , तिच्यावर रसरंगाची बरसात करण हे वसंतराजाचं कर्तव्यच आहे .....


“ आला वसंत ऋतू आला , आला

वसुंधरेला हसवायाला सजवीत नटवीत लावण्याला

रसरंगाची करीत उधळण मधुगंधाची करीत शिंपण

चैतन्याच्या गुंफीत माला रसिकराज पातला”


वसंताची जादूच अशी न्यारी ....

वसंताची नुसती चाहूल लागताच वृक्ष लता टवटवीत होतात , फुले मधुर अमृताने भरून जातात . विरही जनांच्या हृदयावरील दुःखाचे सावट नाहीसे होते . कारण त्यांचे दुख जाणणारा , ते दूर करणारा त्यांचा सखा आता आलेला असतो .


“ व्याकूळ विरही युवयुवतींना

मधुर काल हा प्रेम मिलना

मदन सखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला

आला वसंत ऋतू आला , आला”


वसंत ऋतू प्रेमीजनांना संकेत देतो कि आता तुमचा विरह काळ संपला . तुमच्या मिलनाचा काळ समीप आला आहे . हा संकेत मिळताच मन उत्तेजित होउन मिलनोत्सवाच्या तयारीला लागत .

या ऋतूराजाचे तीर सुद्धा मधाळ मोहक हवेहवेसे असतात . या तीरांनी घायाळ झालेलं कुणी चांदण्यात झोके घेण्यात गुंगून जातं , तर कोणी गगनातील तारे खुडून त्याचे गजरे बनवू लागतं .


“ ऋतू राजा ने तीर चलाया

जिया ललचाया सखी

आया बसंत , हुआ बिरहा का अंत

सखी आया बसंत .....

चंदा तले झूला डालो सखी

चलो तारों के गजरे बना लो सखी

झूला डालो सखी झूला डालो सखी

हठ छोड़ो नजरिया उठा लो सखी

बाँके बलमा को अपना बना लो सखी "


प्राचीन काळच्या कालिदास आणि बाणभट्ट पासून आजच्या ग दि माडगूळकरांपर्यंत वसंत ऋतूने सर्वांनाच भुरळ पाडली .

भारतात वसंत ऋतू माघातील शुक्ल पक्षातील पंचमी पासून सुरु होतो . अगदी प्राचीन काळापासून भारतात वसंतोत्सव साजरा केला जातो . 


संस्कृत साहित्यातील अनेक काव्यात व नाटकात वसंत ऋतूचे देखणे वर्णन मिळते . पळसाच्या लालभडक फुलांना वसंतातील शृंगाराची उपमा दिली आहे .


भवभूती लिखित “मालती माधव” नुसार प्राचीनकाळी वसंतोत्सव साजरा करायला कामदेवाची पूजा केली जात असे . ह्या मदनोत्सवात स्त्री पुरुष एकत्र येऊन फुलांचे हार बनवत असत आणि एकमेकांवर अबीर कुमकुम उधळून नृत्य गायन करत असत .


" ऋतू संहार " ही विश्वविख्यात महाकवी कालिदासाची सर्वात पहिली रचना . सहाही ऋतूंचे अत्यंत काव्यात्मक वर्णन असलेल्या या काव्यात कालिदासाने वसंत ऋतुचे वर्णन सर्वात शेवटी केले आहे .

कारण मान देण्यासाठी इतर सर्वांनी हजेरी लावल्यावर राजा दरबारात सर्वात शेवटीच प्रवेश करतो . कालिदासाने वसंताला हातात प्रेमाचा धनुष्य घेतलेला योद्धा म्हटले आहे .कालिदासाच्या वसंत ऋतूत विलासप्रेमी मने आहेत , मधुगंध वाहणारा वारा आहे , चंदन आणि केशराने स्वतःला विभूषित करणाऱ्या विलासिनी आहेत , उन्मत्त भुंगे मधुभरल्या कुसुमाचे चुंबन घेत आहेत , वृक्षांवरील नवपल्ल्वांना वारा हळूहळू झुलवतो आहे . कालिदासाचा हा वसंत हृदयात एक खास जागा पटकावतो .....


बाणभट्टाने तर आपल्या “कादंबरी” मध्ये वसंत ऋतूचे अप्रतिम चित्र रेखाटून जी बहार आणली आहे त्याला साहित्यात इतरत्र कुठेही तुलना नाही .

वसंत ऋतूत विविध जातीच्या कमलपुष्पांमुळे शोभिवंत झालेले सरोवर , कामुकांना उत्तेजित करणारे आम्रमंजिऱ्यांचे नाजूक तुरे , मदिरा पिऊन मत्त झालेल्या कामिनींनी टाकलेल्या मद्याच्या चुळीच्या शिंपणीमुळे पुलकित होणारे बकुल वृक्ष , ललनांनी अशोक वृक्षावर लत्ताप्रहार केल्याने त्यांच्या पायातील रत्नजडित पैंजणांचे हवेत उमटलेले हजारो झंकार , भुंग्यांच्या काळ्याशार झुंडीमुळे काळ्या दिसणाऱ्या दारूहळदीच्या कळ्या , पुष्पपल्लवांच्या लतेत लपून फुलांमधील मधाचे फवारे आसमंतात उडवणाऱ्या कोकिळा , कामदेवाच्या पुष्पबाणाच्या अविरत वर्षावामुळे भर दिवसा मदनबाधा झाल्याने आपल्या प्रियकराला भेटायला लगबगीने संकेतस्थळी जाणाऱ्या अभिसारिका .

 कादंबरीतील वसंत ऋतूच्या ह्या वर्णनामुळे प्रणयरसरंगाच्या सागराला उधाण आले आहे .


माडगुळकरांच्या मनातील वसंतही असाच आहे , प्रेमीजनांना एकत्र आणणारा .

जिथे वसंताच्या चाहुलीने पक्षी , प्राणी आणि वृक्ष देखील बहरतात तिथे मानवी हृदयाची काय कथा ? वसंताच्या साक्षीने मानवाच्याही आजवर मनातच राहिलेल्या अस्फुट प्रेमभावनांना कंठ फुटतो .


“ कोकीळ कुहू कुहू बोले

तू माझा तुझी मी झाले

ऋतुराजा तुझी वासंती

तरुतळी इथे एकांती

करकोमल देता हाती

चांदण्यात दिवसा न्हाले ”


वसंतात प्रेमाच्या खेळाला उधाण आलेलं असतं .....

अशा नशिल्या वातावरणात भान हरपून प्रेमी प्रणयाच्या खेळात धुंद झालेले असतात ......

वाऱ्याबरोबर उंचच उंच झोके घेणारे मन , नजरेतून डोकावणारी ती बहारदार रंगीत स्वप्ने , दोघांच्या हर्षभरित ताना आणि त्यांना साथ देणारे कोकीळ आणि मोर .


“ झूले में पवन के आई बहार

नैनों में नया रंग लाई बहार

प्यार छलके हो प्यार छलके .....

बादल झूम के आये गागर प्यार की लाये

कोयल कूकती जाये बन में मोर भी गाये

छेड़ें हम-तुम मल्हार प्यार छलके "


ही झाली प्रेमाच्या खेळात पारंगत असलेल्यांची स्थिती . पण त्यांचं काय जे नुकताच यौवनाचा उंबरठा ओलांडू पाहत आहेत ? आजवर ह्या अनोख्या प्रीतीच्या भावनेशी अनभिज्ञ होते ?


हृदयात वसंताच्या आगमनाने काहीतरी चलबिचल नक्कीच झाली पण ती का झाली ते काही उमगत नाही . ह्या विलक्षण हळुवार भावनेला नावही देता येत नाही .

ही काहीशी जाणती काही अजाणती स्थिती सुद्धा खूप गोड असते . ती शब्दात नाही सांगता येत , स्वत: अनुभवावी लागते .


“ आला वसंत देही मज ठावूकेच नाही

भीतीविना कशाचा देहावरी शहारा

हे उन भूषविते सोन्या परी शरीरा

का गुंफिली जरीने अभाळीची निळाई ....

ओठात थांबते का हासू उगाच माझे

बाहेर डोकविता का बोल आज लाजे

तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई ....

हे आज काय झाले माझे मला कळेना

या नेणत्या जीवाला हे गुज आकळेना

ये गंध मोगर्‍याचा अली फुलून जाई ”


काही नवयौवना मात्र चाणाक्षपणे वसंताने दिलेले संकेत ओळखतात आणि आपला एकटेपणा घालवायला काल्पनिक का होइना पण त्याला साद घालतात .

“ देखोजी बहार आई, बाग़ों में खिली कलियाँ

आना है तो आजाओ, सूनी हैं मेरी गलियाँ ... “


प्रत्यक्ष मिलन शक्य नसलं तरी स्वप्नांवर तर कोणाचा पहारा नसतो ना ..... अगदी समाजाला , लोकलज्जेला घाबरणारा सामान्य माणूस सुद्धा स्वप्नात आपल्याला हवं ते मिळवूच शकतो की ....


“ दुनिया से जो डरते हो ख्वाबों में चले आओ

दो बोल मुहब्बत के तनहाई में कह जाओ

आजाओ मना लेंगे, सपनों में रंग-रलियाँ ....

हम दिल से तुम्हारे हैं ये कह भी नहीं सकते

और तुम से जुदा हो कर हम रह भी नहीं सकते

तुम बिन आशाओं की, कैसे खिली कलियाँ ....

आन हैं तो आजाओ, सूनी हैं मेरी गलियाँ

देखो जी बहार आई, बाग़ों में खिली कलियाँ .... “


कोणाचं तरी होऊन राहण्यात काय गम्मत असते आणि विरहातही कोणतं सुख मिळत हे वसंत ऋतुच आपल्याला शिकवतो .

असा हा वसंत ऋतू सर्वांच्याच हृदयात एक जबरदस्त ओढ निर्माण करतो . बावरलेल्या मनाला हिम्मत देतो आणि मन अगदी मुक्तपणे गाऊ लागतं .....

“ हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे .... “


© नयना पिकळे

मंगळवार, २८ जानेवारी, २०२५

ओ पी नय्यर - तुमसा नहीं देखा ( भाग 2 )

 आशा भोसले आणि ओ पी नय्यर ....


संगीत विश्वातील एक अत्यंत यशस्वी , एकमेकांना सर्वार्थाने पूरक ठरलेली जोडी ....
ओपींच्या “आईये मेहेरबान” ला आशाने आपल्या आवाजात प्रतिसाद दिला आणि ओपींना एक सोनसळी मखमली आवाज गवसला ... तर आपल्याच मोठ्या बहिणीच्या लता मंगेशकरच्या सावलीत झाकोळून गेलेल्या आशाच्या आवाजाला ओपींच्या स्वरुपात अत्माविशावासाची , नवचैतन्याची साथ मिळाली .....
"मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूँ
मगर चाँद तारे मुझे जानते है "
म्हणत आशाने जणू ओपींना आश्वासनच दिलं ....

ओपी आणि आशा म्हणजेच सुपर सुपर हिट गाणं असंच समीकरण झालं ....
त्या दोघांच्याच गाण्यांचं एक आगळं विश्व आहे .....
त्या विश्वाचे लाखो करोडो चाहते आहेत .....
आशाचा आवाज अतिशय व्हर्सटाइल आहे हे तर सगळेच जाणतात ......
पण ओपींकडे गाताना आशाचा आवाज जास्तच खास लागत असे ....

“ये क्या कर डाला तुने” अशी लाडिक कबुली
“बेईमान बालमा मान भी जा” मधलं गोड आर्जव
“आंखो से जो उतरी है दिल में” मधली धुंदी
“वो हसीन दर्द दे दो जिसे मैं गले लगा लू“ – मधली उत्कट विनंती
विरह , प्रेम , प्रणय , धुंदी , मादकता ह्या नेहेमीच्याच भावना ....
पण ओपीं साठी गाताना आशाच्या आवाजाला एक वेगळीच उंची प्राप्त होत असे .....
दोघांनी मिळून अनेक कलाकृतींचं सोनं केलं आहे .....

रागिणी मधलं किशोर कुमार आणि आशाने गायलेलं भन्नाट विनोदी
“मै बंगाली छोकरा” आणि
“चना जोर गरम बाबू” ही हलकीफुलकी विनोदी गीते ऐकल्यावर कळतं की प्रणयी गाण्यांप्रमाणेच मिश्कील खट्याळ गाणी हा सुद्धा ओपींचा forte होता .....
“अब तो जी होने लगा किसीकी नजर का सामना”
“चल दिये बंदा नवाझ“
“अच्छा जी माफ करदो थोडा इन्साफ करदो“
“हमदम मेरे खेल न जानो“
सारखी अनेक छेडछाड टाईप खोडकर गाणी ओपींनी आपल्या युनिक स्टाईल मध्ये बनवली ....

ओपींनी मोहम्मद रफीला सुद्धा एक से एक लाजवाब गाणी दिली ...
“जवानियाँ ये मस्त मस्त बिन पिये”
“हमदम मेरे मन भी जाओ”
“आपके हसीन रुख पे आज”
“न जाने क्यू हमारे दिलको तुने”

पण जेव्हा ह्याच रफी बरोबर बेबनाव झाला तेव्हा महेंद्र कपूरला घेऊन
“मेरा प्यार वो है के मरके”
“मेरी जान तुम पे सदके”
“आँखो में कयामत का काजल”
अशी बेहतरीन गाणी देऊन ती तितक्याच सहजतेने लोकप्रिय करून दाखवली .
लता ऐवजी आशा , रफी ऐवजी महेंद्र कपूरला घेऊन ओपींनी सिद्ध केलं की संगीताच्या दुनियेत कोणीही indispensable नसतं.
ओपींच्या रोमांटीक गीतांनी अनेक नवीन अभिनेत्यांची करीयर घडवली म्हटलं तर वावगं ठरणार नाही ....

‘मुझे देखकर आपका मुस्कुराना” आणि
“दिल कि आवाज भी सुन” मधला जॉय मुखर्जी ....
“पुकारता चला हुँ मै” आणि “लाखो है यहा दिलवाले” मधला विश्वजीत ....
“ ये चाँद सा रोशन चेहरा” आणि “कहीं न कहीं दिल लगाना पडेगा” मधला एव्हर ग्रीन शम्मी कपूर ....
या सर्वांची चोकॉलेट हिरोची इमेज बनविण्यात ओपींचा फार मोठा वाटा आहे .
“मै सोया अँखिया मिचे” आणि
“एक परदेशी मेरा दिल ले गया”
म्हणायला लावून भारत भूषणला देखील ओपींनी कधी नव्हे ते तरुण बनवलं ....

ओपींच्या संगीतातून कोवळं उत्साही तारुण्य झळकायचं म्हणूनच
“आपके हसीन रुख पे आज नया नूर है” म्हणताना अगदी रांगडा धर्मेंद्र देखील हळवा दिसतो .....
धीरगंभीर भावूक भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गुरु दत्तलाही
“ऐ जी दिल पर हुआ ऐसा जादू” ,
“मै खो गया यही कही”
“सुन सुन सुन सुन जालीमा” सारखी उडत्या चालीची बहारदार गाणी ओपींनी दिली ....
“जाने कहा मेरा जिगर गया जी”
“सुनो सुनो मिस चटर्जी”
“मै बंबई का बाबू” अशी विनोदी गाणी मिळूनही जॉनी वॉकर हिरो मटेरियल वाटतो तो ओपींच्या खास स्टाईल मुळेच ....

ओपींची प्रणयी युगलगीते म्हणजे जणू प्राजक्ताची हळुवार पाखरण ..... चाफ्याचा घमघमणारा सुगंधी दरवळ .....
"सोने कि चिडीया" सारख्या गंभीर चित्रपटात देखील त्यांनी तलत मेहमूद आणि आशा भोसलेच्या आवाजातील
"सच बता तू मुझपे फिदा" आणि
"प्यार पर बस तो नही"
ही दोन अविस्मरणीय गाणी दिली .....
“उधर तुम हसीन हो इधर”
“उडे जब जब झुल्फे तेरी”
“ये मेरे हाथ में तेरा हाथ”
“नाजनी बडा रंगी है वादा तेरा”
“देखके तेरी नजर बेकरार हो गये”
अशी अगणित अवीट गोडीची युगल गीते ओपींनी दिली ....

अस वाचनात आलं की कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेतलेल्या ओपींनी रागिणी चित्रपटात
“मन मोरा बावरा” आणि “छोटासा बालमा” ही दोन अप्रतिम गाणी तिलंग रागात बांधली आहेत ....
तसच "फागुन" चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी त्यांनी पिलू रागात बांधली ... यातील
“एक परदेसी मेरा दिल ले गया"
"तुम रूठ के मत जाना"
"जानु जानु रे काहे खनके है"
"मैं सोया अँखिया मिचे"
ही गीते आजही लोकप्रिय आहेत.

ओपींच्या गाण्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिध्द घोड्यांच्या टापांचा ठेका .....
“बंदा परवर थाम लो जिगर”
“माँग के साथ तुम्हारा”
“पिया पिया पिया मोरा जिया पुकारे”
“यु तो हमने लाख हंसी देखे है”
“जरा हौले हौले चलो मोरे साजना”

पण म्हणून ओपींनी गंभीर , अर्थपूर्ण संगीत बनवलेच नाही असे नाही ....
“वो हँस के मिले हमसे हम प्यार समझ बैठे”
“है दुनिया उसीकी जमाना उसीका”
“आना है तो आ राह में”
“तुकडे है मेरे दिल के”
ही दर्दभरी गाणी ऐकताना त्याची खात्री पटते.

“थोडासा दिल लगा कर देख” मुसाफिरखाना चित्रपटातल्या रफी आणि शमशादच्या ह्या युगल गीतात रफीच्या आवाजाचा वापर वाद्या सारखा कलात्मकतेने करणारे ओपी बहुतेक एकमेव संगीतकार असतील ....

आयुष्यभर ओ पी नय्यर स्वतःच्या मतांशी प्रामाणिक राहिले ....
त्यांची मत बरोबर होती की नाही हे ठरवायची आपली योग्यता नाही .
पण एवढं मात्र खरं की त्यांनी कधीच आपल्या तत्वांशी समझोता केला नाही .
ज्यांच्याशी पटलं त्यांना बरोबर घेऊन आणि ज्यांच्याशी नाही पटलं त्यांना सोडून ओपी पुढे जात राहिले ....

उघडपणे कोणाही समोर त्यांनी कधीच हार मानली नाही .
पण त्यांच्या याच हट्टी स्वभावामुळे शेवटी शेवटी मात्र ते एकटे पडले
“चल अकेला चल अकेला चल अकेला
तेरा मेला पीछे छुटा राही चल अकेला”
ह्या गाण्याला चाल लावताना ओपींच्या मनात असंच काही आलं असेल का ?

अगदी ज्या आशा बरोबर ओपींचे मनापासून सूर जुळले होते तिच्यासामोरही ते शेवटपर्यंत नमले नाहीत . पण आशा बरोबरच्या बेबनावा नंतर ओपीच्या संगीतातील जादू निघून गेली हे सत्य मात्र कोणीही नाकारू शकत नाही .

"तुम रूठ के मत जाना
मुझसे क्या शिकवा
दिवाना हुं दिवाना" ....
असं मनातल्या मनात म्हणत ओपींनी आशाला विनवलं असेल का ?

की मग त्याचं दोघांचं शेवटचं गाणं असलेल्या
"चैन से हमको कभी आपने जीने ना दिया
जहर भी चाहा अगर
पीना तो पीने ना दिया" ....
मधुन ओपीनी आपलीच तक्रार मांडली ?

ह्या गाण्याविषयी एक किस्सा आहे – आशा आणि ओ पी नय्यर मध्ये झालेल्या बेबनावा मुळे हे गाणे आशा भोसलेने चित्रपटात घालू दिलं नाही ...
आणि तरीही त्या गाण्यासाठी आशाला १९७५ सालचा सर्वोत्कृष्ट गायिकेचे फिल्मफेयर पुरस्कार मिळाला ...
आशा भोसलेंनी पुरस्कार स्विकारायला नकार दिला ...

हे कळल्यावर ओपी स्वतः तो पुरस्कार स्विकारायला गेले आणि येताना वाटेत गाडी थांबवून तो पुरस्कार त्यांनी समुद्रात फेकून दिला ...
असे होते ओ पी नय्यर ..... अत्यंत मानी आणि मनस्वी .....
आणि म्हणूनच अनेक घाव सोसूनही कुणाही समोर न झुकणारे ....
बहुतेक नया दौर चित्रपटातलं
“दिल लेके दगा देंगे
यार है मतलब के
ये देंगे तो क्या देंगे“
यातलं वास्तव त्यांनी फार पूर्वीच जाणलं असावं ...

ज्या संगीत क्षेत्रात कोणत्याही गोष्टीला लता मंगेशकर ह्या नावाशिवाय पूर्णताच येत नाही त्याच क्षेत्रात ओपींनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत लताच्या भरभक्कम स्वराच्या आधारा शिवाय आपली गुढी नुसतीच रोवली नाही तर जवळ जवळ ३ दशके उत्कृष्ट संगीत देऊन ती गुढी दिमाखाने मिरवली देखील .

हे असे धाडस फक्त ओ पी नय्यर हे एकमेव संगीतकारच करू शकले .....
आणि म्हणूनच ह्या निधड्या छातीच्या संगीतकाराला
“यु तो हमने लाख हंसी देखे है
तुमसा नाही देखा”
असा मानाच कुर्निसात करावसा वाटतो .....


© नयना पिकळे

ओ पी नय्यर - "तुमसा नही देखा" (भाग 1)

 ओ पी नय्यर ...

प्रणयी , मदमस्त , मधाळ गीतांचे बादशाह ...

त्यांच्या बद्दल प्रत्येक सच्च्या संगीतप्रेमीच्या तोंडून
“बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी
मेरी ज़िन्दगी में हुज़ूर आप आए” …….
हेच शब्द बाहेर येतील यात शंकाच नाही .
जर त्यांची गाणी नसती तर एक अख्खी तरुण पिढी विराण निरस आयुष्य जगली असती .
त्यांच्या गीतांतून प्रणय ओसंडून वाहत असे .

“बलमा खुली हवा में” मधला धुंद मदहोश करणारा प्रणय
“जाईये आप कहाँ जओगे” हुस्न ने इश्क़ला दिलेलं खुल आव्हान
“रेशमी सलवार कुरता जाली का” मधली खट्याळ नोकझोक आणि
“हुवे हैं तुमपे आशिक़ हम” अशी दिलखुलास कबुली
“सर पर टोपी लाल हाथ में रेशम का रुमाल” रफीच्या रंगेल रांगड्या आवाजातील मनाला लोभवणारा मिश्कील खोडकर प्रणय
ही सारी गाणी आठवली की जख्ख म्हाताऱ्यांमध्येही जोश येतो .....

त्यांच्या गीतांमध्ये पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा लाजवाब मिलाफ आणि पंजाबी लोकगीताची झलक होती .....
ओ पी नय्यर म्हटलं की डोळ्यापुढे येतो सहा फुट चार इंच अशी ताडमाड उंची असलेला ताठ कण्याचा , गाजरासारख्या लालबुंद चेहऱ्याचा , बेदरकार वृत्ती दर्शवणाऱ्या निळसर डोळ्यांचा संगीतकार ....
बराचसा आडमुठा स्वभाव , स्पष्टवक्तेपणा आणि तरीही स्वतःच्या सामर्थ्यावर असलेला सार्थ विश्वास .

लता सारख्या गानसम्राज्ञीशी झालेला बेबनाव असो , मोहम्मद रफी सारख्या सूरसम्राटा बरोबरचा वाद असो की साहीर सारख्या शब्दप्रभूशी न जुळलेले सूर .
ओपींचे कधीच कोणावाचून अडले नाही .
ते प्रत्येक वेळी एकटेच पुढे जात राहिले आणि मुख्य म्हणजे यशस्वी होत गेले .

"बदल जाये अगर माली
चमन होता नहीं खाली
बहारें फिर भी आती हैं
बहारें फिर भी आयेंगी"
"बहारे फिर भी आयेंगी" चित्रपटातील या ओळी संगीताच्या दुनियेत जर कोणी खर्या अर्थाने सार्थ केल्या असतील तर ते होते संगीतकार ओ पी नय्यर ….

ओ पी नैय्यर .... ओम्कारप्रसाद नय्यर ....
१६ जानेवारी १९२६ रोजी लाहोर येथे त्यांचा जन्म झाला ...
संपूर्ण घराणं उच्चशिक्षित असूनही छोट्या ओम्कारचं मात्र मन लाहोरच्या हीरामंडी मधल्या गायिकांची गाणी ऐकण्यात रमायचं ....
तिथलं वातावरण त्याला मोहात पाडायचं ...
घुंगरांची रुणझुण , सतार सारंगीचे सूर त्याच्या कानात २४ तास घुमायचे ...

त्याच्या जन्माच्या वेळी म्हणे त्याच्या आईला हर्मोनिम ऐकण्याचे , वाजविण्याचे कडक डोहाळे लागले होते ....
लाहोर मधल्या नय्यरांच्या कर्मठ सनातनी घरात आईला बाजा शिकवायला मास्टरजी येऊ लागले ...
म्हणजेच जन्मा आधीच ओपींवर संगीतसुरांचे गर्भसंस्कार झाले होते तर .

वयाच्या दहाव्या वर्षापासूनच लाहोर रेडीयो केंद्रावर ते गझल गायचे .
न्यू थियेटर्सच्या संगीताचा ओपींवर जबरदस्त प्रभाव होता ....
न्यू थियेटर्सचे आर सी बोराल , के एल सैगल, पंकज मलिक , कानन देवी ही त्यांची दैवते होती ...
ओ पीं च्या अनेक गाण्यात ऐकायला मिळणाऱ्या घोड्यांच्या टापांचा स्रोत
“चले पवन की चाल”
हे पंकज मलिक यांनी गायलेलं व संगीत दिलेलं गाणं आहे असं खुद्द ओपींनीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंं आहे ....

१९५२ सालचा ''आसमान" ओपींनी संगीत दिलेला पहिला चित्रपट ... यातलं
“देखो जादूभरे मोरे नैन”
हे गीता दत्तने गायलेलं गाणं आजही रसिकांना भुरळ घालतं .
पण हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आणि त्या नंतरचे “छम छमा छम” आणि “बाज” हे चित्रपटही चालले नाहीत .
“छम छमा छम” मध्ये गीता दत्तची
“जरा सामने आ जरा आँख मिला”
आणि
“ऐ दिल ऐ दिवाने”
ही गाजलेली गाणी होती .
पण हा चित्रपटही सणसणीत आपटला आणि ओपी निराश होऊन आपला बाडबिस्तरा गुंडाळून लाहोरला परत जायच्या तयारीला लागले .

आणि अशातच आला गुरु दत्तचा “आरपार” .....
आणि चंदेरी दुनियेत अवतरला सुरांच्या जादुनगरीतून आलेला एक जादुगार .....
सर्वांसाठी कधीही न आटणारा प्रेमाचा , मस्तीचा खळाळता झरा घेऊन ....
“लेके पहला पहला प्यार भरके आँखो में करार
जादू नगरी से आया है कोई जादुगर”
पुढील तीन दशके रसिकांना आपल्या जादूच्या पोतडीतून अनेक लाजवाब चाली ऐकवून त्याने विस्मित करून सोडलं ....
"आरपार " ......
ओपींच्या यशस्वी चित्रपट कारकिर्दीच्या शिडीची पहिली भक्कम पायरी ...
यातलं एकूणएक गाणं प्रचंड गाजलं .....

आरपार म्हटलं की शमशादच्या ठसकेबाज आवजातलं
“कभी आर कभी पार लागा तीरे नजर” कानात घुमू लागतं .
रफी आणि गीता दत्तचे
“सुन सुन सुन सुन जालीमा”
हे खोडकर गाणं कैक वर्ष मागे कॉलेजच्या तरुणाईच्या दिवसात घेऊन जातं .
“सुन सुन सुन सुन जालीमा” ह्या गाण्याचं गीताने गायलेलं विरही वर्जन देखील तेवढंच परिणामकारक , हृदयद्रावक ...
“अर्रे ना ना ना ना तोबा तोबा” हे धम्माल विनोदी गाणं मनमुराद हसवतं
तर “ये लो मै हारी पिया”
मधली प्रेमात सपशेल हार मानणारी गीता दत्तची लाडिक कबुली ऐकणाऱ्याचं हृदय जिंकते ....
आणि ह्या सर्वांवर कळस म्हणजे हळुहळु नशा आणणारी गीताच्या मादक आवाजातील
“हुँ अभी मै जवाँ ऐ दिल” आणि
“बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना”
ही दोन मदमस्त क्लब साॅन्ग्स ....
गीता आपल्या मादक स्वरात
“प्यार में जरा संभलना” .... म्हणत सावधानतेचा इशारा देते खरा , पण तोवर रसिकांवर गाण्यांची अशी काही नशा चढलेली असते की तिचे सगळेच इशारे बेदखल केले जातात .
गम्मत म्हणजे “बाबूजी धीरे चलना” असं लोकांना सांगणाऱ्या ओपीच्या नशिबाची घोडदौड मात्र “आरपार“ चित्रपटापासूनच भरधाव वेगात सुरु झाली ....

Mr & Mrs 55 , C I D , तुमसा नही देखा , नया दौर , हावडा ब्रिज , एक मुसाफिर एक हसीना , काश्मीर कि कली , मेरे सनम .......
हे व असे अनेक यशस्वी चित्रपट ओ पी नय्यर एकामागून एक देत गेले आणि रसिकांना काय घेऊ आणि काय नको असं झालं ......
आणि मग या जादुगाराने अंथरलेल्या स्वरसुमनांच्या गालिच्यावर बसून संगीतरसिकांची अत्यंत रम्य देखण्या श्रवणीय स्वरनगरीची अद्भुत सफर सुरू झाली .

कधी तिथे “दिवाना हुवा बादल” म्हणत हळुवार प्रेमाची पाखरण होत असे
तर कधी “आओ हुजूर तुमको सितारो में ले चलु” म्हणत थेट चंद्र ताऱ्यांच्या दुनियेत प्रवेश मिळे
कधी “पुछो न हमे हम उन के लिये” म्हणत भावूक केलं जाई
तर कधी “ देखो कसम से देखो कसम से” म्हणत खोड्या काढल्या जात असत
एकीकडे “कजरा मोहोब्बत वाला” ह्या ठसकेबाज कव्वालीचे स्वर कानी पडत

तर दुसरीकडे
“उडे जब जब जुल्फे तेरी” हे ठेकेदार भांगडा नृत्य पाहायला मिळायचं
“मुहब्बत करलो जी भरलो” ऐकून हसु यायचं
तर तेवढ्यात “कभी हमारी मुहब्बत का इम्तिहान तो लो” ऐकून डोळे भरून येत असत
मधूनच “मन मोरा बावरा” हे अफलातून क्लासिकल गाणं देखील ऐकू येई .
अशी बहारदार स्वरसुमनांची उधळण पाहून श्रोते मुग्ध होत असत .

ओपींची गाणी म्हणजे ऐकणाऱ्याला चिंब करून सोडणारा उत्साहाचा आनंदाचा अखंड जोशीला धबधबाच .
ओ पी नय्यर यांनी आपल्या संगीतात शमशाद बेगम , गीता दत्त आणि आशा भोसले यांच्या आवाजाचा सर्वात जास्त वापर केला …

आता हेच पहा ना ....
“लेके पहला पहला प्यार” आणि
“कभी आर कभी पार” मधला शमशादचा धीटपणा ....
“कही पे निगाहे कही पे निशाना” मधला अनोख्या अंदाजात दिलेला सावधानतेचा इशारा
“बुझ मेरा क्या नाम रे” मधला आगळा गोडवा
“जरा प्यार करले बाबू” असा गोड सल्ला कोण बरं नाकारेल ?
“मै जान गयी तोहे सैय्या” मध्ये तर शमशादने सैंय्याला चांगलीच ताकीद दिलिये आणि
“सैय्या तेरी अन्खियो में दिल खो गया” मध्ये सरळ सरळ त्याच सैंय्यावर भाळली आहे ...
ओ पीं नी शमशादला दिलेली ही सगळी गाणी हलक्या फुलक्या मूड मधली तिच्या खणखणीत आवाजाला साजेशी अशीच होती .
ओ पीं च्या संगीतात शमशादच्या आवाजाने आणखीनच मुक्त भरारी घेतली .

जिथे जिथे ओ पीं ना आपल्या संगीतात मादकता , मदहोशी हवी असायची तिथे त्यांना गीता दत्तच्या नशिल्या आवाजाने पुरेपूर न्याय दिला .
“हुँ अभी मै जवाँ” मधली नशीली साद
“थंडी हवा काली घटा” मधला मधाळ गोडवा
“जाता कहाँ है दिवाने” मधलं धीट आव्हान
“रात नशीली रंगरंगीली मस्त हवा” मधलं रंगीलं आमंत्रण आणि
“प्रीतम आन मिलो” ह्यात तर गीताचा आर्त स्वर काळजाचा ठाव घेतो
“मेरा नाम चीन चीन चू” मधला खोडकर नखरेलपणा अनुभवायला आणि
“कैसा जादू बलम तुने डारा”
मधल्या मदहोश करणाऱ्या नशेसाठी गीता दत्तच्या खट्याळ , मादक आवाजाला पर्याय नाही असं नाही का वाटत तुम्हाला ?

© नयना पिकळे
(क्रमशः)

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४

संगीतकार - सचिन देव बर्मन

 “ ओ रे मांझी ओ रे मांझी ” .....

लहानपणी कधी हे गाणं कानावर आलं की त्या अजाणत्या वयातही ह्या गाण्यातलं वेगळेपण जाणवायचं .
आवाज बराचसा खरखरीत , अनकन्वेशनल , सिनेपार्श्वगायकाच्या नॉर्मल व्याख्येत न बसणारा ....
तरीही खोल कुठेतरी मनाला स्पर्शून जाणारा ....

ऐकणाऱ्याला भुरळ घालायची जबरदस्त ताकद होती त्या आवाजात .......
पण तरी गाणं ऐकताना असंही वाटायचं की कोणी बरं अशा आवाजाच्या माणसाला हे गाणं म्हणायला दिलं असेल ?

माझ्या काकाला विचारल्यावर कळलं की ज्याने हे गीत गायलंय त्यानेच त्याला संगीतही दिलंय आणि त्यानेच
"हाल कैसा है जनाब का" आणि
“ अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना "
ह्या माझ्या आवडत्या गीतांनाही संगीत दिलंय ....

आणि मग काय ..
नेहेमीप्रमाणे एस डी बर्मन म्हणजेच सचिनदांची सगळी गाणी शोधून शोधून ऐकायचा छंदच जडला .....

सचिन देव बर्मन .... त्रिपुराचा राजकुमार ....
त्रिपुरा मधल्या कोमिल्ला नावाच्या गावी एका राजघराण्यात १ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांचा जन्म झाला .
आईवडील दोघेही संगीताचे चाहते .
वडील तर स्वतः उत्तम सतारवादक .
सचिनदांनी संगीताचे प्राथमिक धडे खुद्द वडिलांकडेच गिरवले ...
गायक मन्ना डे त्यांचे काका आणि स्वतः त्या काळचे प्रख्यात गायक असलेले के. सी. डे हे सचिनदांचे गुरु .

१९४४ साली संगीतात यशस्वी कारकीर्द करायचं स्वप्न उराशी बाळगून सचिनदा जेव्हा स्वप्ननगरी मुंबईत आले तेव्हा मुंबईची अवस्था नक्कीच
“ दिवाना मस्ताना हुआ दिल
जाने कहाँ होके बहार आयी ”
अशीच झाली असणार .

शिकार १९४६ ह्या चित्रपटात सचिनदांनी सर्वप्रथम संगीत दिलं . त्यातलं अशोक कुमारनेच म्हटलेलं
“ डोल रही है नैय्या मेरी “
हे गाणं त्याकाळी बऱ्यापैकी लोकप्रिय झालं .
गाण्याच्या सुरुवातीचा प्रदीर्घ म्युझिक पीस म्हणजे जिवंत निर्झरच जणू .

पण त्यांचं खऱ्या अर्थाने गाजलेलं पहीलं गाणं होतं दो भाई (१९४७) चित्रपटातलं गीता दत्तने म्हटलेलं
“ मेरा सुंदर सपना बित गया"
ह्या गीताने सचिनदा आणि गीता दोघांना एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आणलं .

त्यानंतर १९५० / १९५१ सालात आलेल्या अफसर , बाजी , जाल , सजा सर्वच चित्रपटांची गाणी प्रचंड गाजली ......
चारही चित्रपटात हिरो होता देव आनंद ......
तेव्हापासूनच देव आनंदची गाणी म्हणजे सचिनदांच संगीत हे समीकरण जणू ठरूनच गेलं .

चॉकलेट हिरो देव आनंदच्या रोमांटिक इमेजला साजेशी गाणी सचिनदांनी दिली आणि त्यांना साथ मिळाली उत्साही जोशीला आवाज असलेल्या किशोर कुमारची .
किशोरच्या यशात सचिनदांचा सिंहाचा वाटा आहे .

१९५०/६० मध्ये दुय्यम दर्जाची हलकी फुलकी विनोदी गाणी गाणाऱ्या किशोर कुमारचं सामर्थ्य सचिनदांनीच सर्वप्रथम ओळखलं .
सचिनदांनी किशोरला देव आनंदसाठी साठी १९५०-७० पर्यंत जवळ जवळ २ दशके गायला लावले .
देव , किशोर आणि सचिनदांनी मिळून काही अप्रतिम स्वररत्नांची लयलूट केलेली आहे .

किशोर कुमारला अवगत असलेल्या अनोख्या याॅडलिंग प्रकारचा सचिनदांनी आपल्या संगीतात खूप सुरेख वापर करून घेतला आहे ....
"चाहे कोई खुश हो चाहे" ( Taxi Driver – १९५४ )
"उंचे सूर में गाये जा" ( House No 44 – १९५५ )
"ऐ मेरी टोपी पलट के आ" ( फंटूश – १९५६ )
"हाय हाय हाय ये निगाहे" ( पेइंग गेस्ट – १९५७ )

फंटूश चित्रपटाच्या वेळी अनेकांचा विरोध सहन करून कुणालाही न जुमानता सचिनदांनी किशोरकडून
“ दुखी मन मेरे सून मेरा कहना"
हे अतिशय सुरेख गीत गाऊन घेतलं .....
किशोरने सचिनदांसाठी गायलेली
"मीत ना मिला रे मनका" ( अभिमान – १९७३ )
"बडी सूनी सूनी है जिंदगी ये जिंदगी" ( मिली १९७५ )
ही गाणी सुद्धा अप्रतिम आहेत .....

किशोर कुमारच्या खालोखाल देव आनंद साठी सचिनदांनी अनेक चित्रपटात हेमंत कुमारच्या आवाजाचा अप्रतिम वापर केलेला आहे ......
हेमंत कुमारच्या धीर गंभीर आवाजाला खुलवणारं
"तेरी दुनिया में जीने से" ( house no 44- १९५५ )
"चूप है धरती चूप है चांद सितारे" ( house no 44- १९५५ ) ,
"ये रात ये चांदनी फिर कहाँ" ( जाल १९५२ )
"है अपना दिल तो आवारा" ( सोलवा साल १९५८)

ह्या बरोबरच
“ दिल कि उमंगे है जवाँ"
हे अफाट विनोदी आणि
“ शिवजी बिहाने चले"
हे लोकसंगीतावर आधारित अशी दोन वेगळ्या जॉनरची गाणीही हेमंत कुमार कडून गाऊन घेतली आहेत .

तसंच प्यासा चित्रपटातील
" जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला "
हे अतिशय दर्दभर गीत हेमंत कुमारला दिलं .

गायिकांमध्ये लता त्यांची सर्वात आवडती .....
तिच्या आवाजात “मनाला शांत करून दु:ख हलकं करण्याचं सामर्थ्य आहे” असे ते म्हणत .....
खायचं पान हा सचिनदांचा विक पाॅईंट ...
पान म्हणजे त्यांचा जीव की प्राण .
स्वतःचं पान ते स्वत:च बनवत असत आणि इतर कुणालाही ते आपलं पान अजिबात देत नसत .
लताला मात्र गाण्याच्या प्रत्येक रेकोर्डिंग नंतर सचिनदांकडून ते खास पान मिळत असे .
लता मधल्या गायिकेला सचिनदां मधल्या संगीतकाराने दिलेला हा सर्वोच्च बहुमान होता .

लताने त्यांच्याकडे अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहेत .....
"ठंडी हवाँये लेहेराके आये" ( नौजवान १९५१ ) एखाद्या आल्हाददायक वाऱ्याच्या झोक्याइतकच प्रसन्न सुरेल
"फैली हुई है सपनो की बांहे" ( house no 44 १९५५ ) स्वप्नांच्या दुनियेत अलवार घेऊन जाणारं
"चाँदनी राते प्यार की बाते" ( जाल १९५२ ) एका विरहिणीची केविलवाणी आर्त पुकार
"चाँद फिर निकला मगर तुम न आये" ( पेइंग गेस्ट १९५७ ) काळीज पिळवटून हृदयाला जाळणारा हा अंगार
"तुम ना जाने कीस जहाँ में खो गये" ( सजा १९५१ ) एकाकी विरहिणीचा हृदयाचं पाणी पाणी करणारा विलाप
"पिघला है सोना दूर गगन में" (जाल १९५२ ) गडद सायंकाळी त्या विश्वरचेत्याने निसर्गाशी केलेलं हितगुजच जणू...
खरंच यातलं एक एक गाणं म्हणजे अमुल्य ठेव आहे .......

आणि ह्याच सर्वात प्रिय असलेल्या लताचं आणि सचिनदांचं मिस इंडिया (१९५७) चित्रपटातील एका गाण्याच्या रेकोर्डिंगच्या वेळी एका लहानशा गैरसमजावरून बिनसलं .
त्यानंतर जवळ जवळ ६ वर्षे त्यांच्यात दुरावा होता .
सचिनदांनी मात्र ह्या काळातही आपल्या संगीताच्या दर्जावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही .
त्यांनी आशा भोसलेच्या आवाजात लाजवाब गाणी देऊन आपली खणखणीत बाजू सिद्ध केली .

पण सचिनदांच्या मनाचा मोठेपणा की त्यांचा मुलगा पंचम ( आर डी बर्मन ) याला त्याच्या छोटे नवाब ह्या पहिल्या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांनी लताशीच बोलणी करायचाच सल्ला दिला आणि संधी मिळताच लताशी परत दिलजमाई केली .
असं वाचलेलं की त्यानंतर सचिनदांनी लताला आपल्या घरी सामोसा खायला यायचं आमंत्रण दिलं .
लताने सुद्धा सचिनदांची योग्यता माहीत असल्याने कोणतेही आढेवेढे न घेता ते आमंत्रण खुल्या दिलाने स्वीकारलं ....

आणि रसिकांवर परत एकदा या सदाबहार जोडीने स्वररत्नांची लयलूट केली .....
"मोर गोरा अंग लै ले" ( बंदिनी १९६३ )
"रात का समा झुमे चंद्रमा" ( जिद्दी १९६४ )
"अबके सजन सावन में" ( चुपके चुपके १९७५ )
"चुपके चुपके चल री पुरवैय्या" ( चुपके चुपके १९७५ )
"नदिया किनारे हेराये आयी कंगना" ( अभिमान १९७३ )
"मैने कहा फुलो से हँसो तो" ( मिली १९७५ )

लता बरोबर बिनसलेल्या काळात सचिनदांनी आशा भोसलेला काही अवीट गोडीची गाणी दिली ज्यांची जादू आजही कायम आहे ....
"कोई आया धडकन कहती है" ( लाजवंती १९५८ )
"गा मेरे मन गा" ( लाजवंती १९५८ )
"देखने में भोला है दिल का सलोना" ( बंबई का बाबू १९६० )
"तुम जियो हजारों साल" ( सुजाता १९५९ )
"काली घटा छाये मोरा जिया तरसाये" ( सुजाता १९५९ )
"ओ पंछी प्यारे सांझ सकारे" ( बंदिनी १९६३ )

जरी किशोरकुमार , हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज सचिनदांनी सर्वात जास्त वापरला तरी इतर गायक गायिकांनाही त्यांनी काही अविस्मरणीय गाणी दिली आहेत .....
मोहम्मद रफी
"नाचे मन मोरा मगन दिकीदा धीकी धीकी" ( मेरी सुरत तेरी आंखे – १९६३ )
"खोया खोया चांद खुला आसमान" ( कालाबाजार १९६० )
"हम बेखुदी में तुमको पुकारे" ( काला पानी – १९५८ )
"ये महलो ये तख्तो ये ताजो की दुनिया" ( प्यासा – १९५७ )
"तू कहाँ ये बता इस नशीली रात में" ( तेरे घर के सामने १९६३ )
"दिन ढल जाये हाये रात न जाये" ( गाईड १९६५ )

शास्त्रीय गीतांसाठी बहुतेक करून निवडल्या जाणाऱ्या मन्ना डेना सचिनदांनी “ मेरी सुरत तेरी आंखे ” चित्रपटात
“ पुछो ना कैसे मैने रैन बिताई " आणि
“ तेरे नैना तलाश करे जिसे " ही गाणी दिलीच पण
"प्यार कि आग में तनबदन जल गया" ( जिद्दी १९६४ ) आणि
"किसने चिलमन से मारा नजारा मुझे" ( बात एक रात कि १९६२ )
ही दोन धम्माल विनोदी बाजाची गीते मन्ना डे कडून गाऊन घेतली .

तलतला त्यांच्या भावूक कंपित मखमली आवाजाला साजेशी
"जलते है जिसके लिये" ( सुजाता १९५९ )
"जाये तो जाये कहाँ" (taxi driver – १९५४) हि सोलो गीते आणि
"आजा आजा तेरा इंतेजार है" ( सजा १९५१ ) हे लता बरोबरचे सुरेल युगल गीत दिले .

मुकेशच्या अनुनासिक आवाजाला साजेशी
"चल री सजनी अब क्या सोचे" (बंबई का बाबू १९६० ) ,
"ओ जाने वाले हो सके तो लौट के आना" ( बंदिनी १९६३ ) आणि
"ये किसने गीत छेडा" ( मेरी सुरत तेरी आंँखे – १९६३ ) हे सुमन कल्याणपूर बरोबरच युगुल गीत दिलं ....

फक्त गायकच नाही तर गायिका सुद्धा त्यांनी चित्रपटातील नायिकेला आणि प्रसंगाला अनुरूप अशाच निवडल्या ...
गीता दत्तच्या मखमली आवाजाचा सचिनदांनी अतिशय सुरेख वापर करून घेतला ....
बाजी १९५१ चित्रपटात त्यांनी गीताला
“ तदबीर से बिगडी हुई तकदीर बनाले "
“ आज कि रात पिया दिल ना तोडो "
“ ये कौन आया "
“ लाख जमाने वाले डाले दिलो पे ताले "
ही लाजवाब गाणी तर दिलीच पण भावूक , करुण गाणी गाणारी म्हणून नाव झालेल्या गीता दत्तला त्यांनी
“ सुनो गजर क्या गाये " आणि
“ देखके अकेली मोहे बरखा सताये " ( ह्यात गीतादत्त चं “उई" अंगावर रोमांच उभ करत )
ही हलकी फुलकी भन्नाट गाणी दिली जी गीता अफाट गायली आहे .

गीता दत्तला सचिनदांनी
"वक्त ने किया क्या हसीं सितम" ( कागज के फूल १९५९ )
"जाने क्या तुने कही" ( प्यासा १९५७ ) ह्या लाडिक खोडकर गाण्याबरोबरच
“ आज साजन मोहे अंग लगालो" हे बंगाली लोकसंगीतावर आधारित असलेलं अप्रतिम भजन दिल .

खणखणीत आवाजाच्या शमशादला
"सैय्या दिल में आना रे" ( बहार १९५१ ) ह्यातलं “ छम छमा छम छम " गाण्याला एक वेगळ्याच पातळीवर नेतं
"दुनिया का मजा लेलो दुनिया तुम्हारी है" ( बहार १९५१ ) वातावरण जोशील करणारं हलकं फुलकं गाणं
"ये दुनिया रूप कि चोर" ( शबनम १९४९ ) हे बहुतेक हिंदी सिनेसृष्टीतल पहिलं बहुभाषिक गाणं असावं
"शरमाये काहे घबराये काहे" ( बाजी १९५१ ) हे बेफाम क्लब सोंग दिलं.

मखमली आवाजाच्या सुरैय्याला त्यांनी अफसर १९५० चित्रपटात
“ मनमोर हुआ मतवाला “
“ नैना दिवाने इक नाही माने ”
“ गुन गुन गुन गुन बोले रे भवर " ही सुरेल तरल गाणी दिली .

गाईड (१९६५) चित्रपटाच्या वेळी मात्र एकाच गाण्याचं संगीत देऊन सचिनदा आजारी पडले .
त्यांनी देव आनंदला दुसऱ्या संगीतकाराला घ्यायची विनंती केली .
देवने सचिनदा पूर्ण बरे होईपर्यंत थांबायची तयारी ठेवली .
सचिनदांनी त्याला विचारलं, “ मी बरा झालो नाहीच तर ?” .
पण देवचीही सचिनदांवर इतकी भक्ती की त्याने म्हटलं “तसं होणार नाही आणि झालंच तर मी एकच गाणं घेऊन चित्रपट काढीन".

पण आपल्या भाग्यात सचिनदांनीच संगीत दिलेला संपूर्ण गाईड होता आणि गाईड ने इतिहास रचला .....
गाईड चित्रपटात सचिनदांच्या प्रतिभेने चरमसीमा गाठली आहे .....
यातलं प्रत्येक गीत म्हणजे एक अनोखा यशस्वी प्रयोगच जणू .
" आज फिर जीने की तमन्ना है "
हे सर्वसाधारण गीताचे नियम झुगारून मुखड्या ऐवजी अंतर्याने सुरु होणारं गाणं .
आपल्या आयुष्यातील सगळी बंधनं झुगारून आजवर बंदिस्त असलेली नायिका मुक्त झाली आहे . तिच्या आजवरच्या काळोख्या आयुष्यात सोनेरी पहाट उगवली आहे .... सचिनदांच्या लाजवाब संगीताने , लताच्या चिरतरुण खळाळत्या आवाजाने आणि वाहिदाच्या जिवंत अभिनयाने अजरामर झालेलं हे गीत ....
“ मोसे छल किये जाये.. सैय्या बेईमान" आणि
“ क्या से क्या हो गया तेरे प्यार में "
केवळ लय कमी जास्त करून एकाच मुशीतून साकार केलेली ही दोन गीतरत्ने म्हणजे त्यांच्या असामान्य प्रतिभेचा ढळढळीत पुरावा .
“ पिया तोसे नैना लागे रे" कल्पक चित्रीकरण , होळी आणि दिवाळीच्या सणांचे वर्णन त्यांना साजेशी वाद्ये तसेच दिवस रात्रीच्या काळातला बदल दाखवणारे संगीत .
ह्या गीतातील असंख्य पैलू दिग्मूढ करतात .
गाईड हा सिनेसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा अशा सर्वांगसुंदर गाईड चित्रपटाच्या यशात सचिनदांचे योगदान नक्कीच लक्षणीय आहे .

निसर्गसौंदर्याने नटलेल्या बंगालच्या बाऊल लोकसंगीताचा जबरदस्त प्रभाव सचिनदांच्या संगीतात जाणवतो .
गाण्यांच्या चाली आधी रचून मग त्या संगीताला साजेशी शब्दरचना करण्यावर त्यांचा भर होता .
त्यांच्या गीतांमध्ये सितार , संतूर , गिटार , बासरी , तबला , ढोल यांचा अतिशय माफक पण सुरेख वापर आढळतो .....
संगीत हा त्यांचा प्राण होता . त्यांच्या आवाजातही एक वेगळीच मोहिनी

" सफल होगी तेरी आराधना "
" सुन मेरे बंधू रे "
" वहाँ कौन है तेरा " ही गाणी ऐकली की त्याचा प्रत्यय येतो .

१९४५ ते १९७५ जवळ जवळ तीन दशक त्यांनी उत्तमोत्तम संगीत असलेली गाणी दिली आहेत .
संगीताची उत्तम जाण असूनही त्यांच्या चाली साध्या सोप्या , आकर्षक , ऐकताच गुणगुणाव्याशा , ओठांवर रेंगाळणाऱ्या असायच्या .
ह्याला कारण त्यांच्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला झालेला एका गमतीशीर प्रसंग होता म्हणायला हरकत नाही .

सचिनदांनी तेव्हा हिंदी सिनेसृष्टीत अगदी ४/५ सिनेमेच जुने होते .
एकदा सचिनदांनी त्यांच्या नोकराला संगीतकार नौशादच्या ( रतन १९४४ ) चित्रपटातल “ अँखिया मिलके जिया भरमाके “ हे गाणं दिवसभर गुणगुणताना ऐकलं .

आपण संगीतकार असूनही आपला नोकर आपलं गाणं न म्हणता नौशादचं गाणं म्हणतो हे पाहून त्यांनी त्याच क्षणी ठरवलं की यापुढे सर्व सामन्यांच्या तोंडी अगदी सहज रुळेल असंच संगीत द्यायचं आणि त्यांनी हाच नियम शेवटपर्यत पाळला .

सचिनदा प्रणयी युगल गीतांचे सम्राट होते ......
“ आ गुपचूप गुपचूप प्यार करे " ( सजा १९५१ ) हेमंत कुमार आणि संध्या मुखर्जी यांच्या आवाजातील ह्या गाण्याचे सुरुवातीचे “ टंबले दो कंबले , नाकेमुके चुनकले नाकेमुके चुनकले “ हे कानाला अतिशय गोड वाटणारे अजब शब्द ऐकून श्रोता आपल्याही नकळत डोलायला लागतो .....

"रिमझिम के तराने लेके आई बरसात" ( काला १९६० )
"इक घर बनाऊंगा तेरे घर के सामने" ( तेरे घर के सामने १९६३ )
"कोरा कागज था" (आराधना १९६९ )
"गुनगुना रहे है भँवरे" ( आराधना १९६९ )
"जीवन की बगिया मेहेकेगी" ( तेरे मेरे सपने १९७१ )
"लिखा है तेरी आँखो में" ( तीन देवीया १९६५ )
"ये दिल दिवाना है दिल तो दिवाना है" ( इश्क़ पर जोर नाही – १९७० ) यात प्रत्येक वेळी शब्दांचा क्रम बदलून एकच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने गायलेलं ऐकायला कसलं गोड वाटतं.

वर सांगितलेली युगलगीते तर सुरेल आहेतच पण त्यांची खट्याळ , खोडकर युगल गीते तर अक्षरशः कहर आहेत
"दे भी चुके हम दिल नजराना दिल का" ( जाल १९५२ )
ह्यात गीता दत्त कसली तोऱ्यात ( राग पुर्राना दिलका ) म्हणते .
"हम आप की आँखोमे" ( प्यासा १९५७ )
यातले स्वप्नाळू प्रेमिकाचे लाडिक सवाल आणि त्याला प्रेयसीने दिलेले जमिनीवर आणणारे जवाब ... यातलं व्हायोलिन लाजवाब

"ओ निगाहे मस्ताना" ( पेइंग गेस्ट १९५७ )
यातलं आशाच्या लाडिक आवाजातलं ( हम्म हम्म ) कानांना किती गोड वाटतं
"छोड दो आँचल" ( पेइंग गेस्ट १९५७ )
यातंही आशा ने म्हटलेला तो " आह " ऐकून कलिजा खल्लास झाल्याशिवाय राहात नाही .
"आँखो में क्या जी" ( नौ दो ग्यारह १९५७ ) मध्येही आशा आणि किशोरचे खट्याळ सवाल जवाब मनाला गुदगुल्या करणारे , हवेहवेसे .... आणि “ बादल " म्हणतानाचा तो अल्लड आलाप तर केवळ लाजवाब...
"अच्छाजी मैं हारी" ( काला पानी १९५८ )
खोडकर मधुबाला आणि चिडखोर देव आनंद कसले दिसतात ...
"मैं सितारोंका का तराना" ( चलती का नाम गाडी १९५९ )
मधला फक्त “ पाँच रुपैय्या बारा आना " किशोर कुमार ने घातलेला गोंधळ तर क्या कहने .
दिवाना मस्ताना हुवा दिल ( बंबई का बाबू १९६० )
ह्यातले विलक्षण आलाप आणि गाण्याला दिलेला वेगळा इको इफेक्ट...
ह्या आणि अशा असंख्य गीतांमुळे ते आजही रसिकांच्या हृदयावर राज्य करत आहेत आणि करतच राहणार ....
त्यांचं प्रत्येक गाणं आजही तितकंच लोकप्रिय , अजरामर आहे .
म्हणूनच आजही त्यांच्या गाण्यासोबत एकट्यानेच लांब लांब रम्य स्वप्नांच्या दुनियेत जावंसं वाटतं .....
त्यांच्या गीतांमध्ये हरवून आपली मंझील गाठावीशी वाटते ....
“ फैली हुई है सपनों की बाहें
आजा चल दे कहीं दूर
वही मेरी मंझील वही तेरी राहें
आजा चल दे कहीं दूर ".....


© नयना पिकळे

सोमवार, १७ जून, २०२४

"अजीब दास्ताँ है ये"

 आपल्याला आवडणार्या प्रत्येक गाण्याच्या आवडीमागे अनेक कारणं असतात. कधी शब्द, कधी संगीत, तर कधी आवडता नायक, नायिका, किंवा गायक गायिका वगैरे वगैरे …..

आणि त्यातूनही काही गाणी तर इतकी आवडीची असतात की त्यातील शब्द, संगीत, वाद्य, आवाज, नायक नायिकेचे हावभाव, त्यांच्या प्रतिक्रिया, गाणं कुठे कसं चित्रित झालंय ह्यासकट मनात कायमचं घर करून बसतात.
आज अशाच एका गाण्याबद्दल लिहीणार आहे …. गाणं आहे आपल्या सर्वांच्याच आवडीचं ….. "अजीब दास्ताँ है ये" ….

खरंतर आपलं आयुष्य म्हणजेच एक दास्ताँ आहे. आणि वास्तव आयुष्यातील घटना अनेकदा कल्पनेपेक्षा अजब असतात हेही तितकंच सत्य आहे . ह्या प्रवासात कुठवर जायच आहे आणि कुठे ठहराव कुठे येईल हे कुणालाही आजवर कळलेलं नाही .

"अजीब दास्ताँ है ये
कहाँ शुरू कहाँ खतम
ये मंज़िलें है कौन सी
न वो समझ सके न हम”

प्रेम कोणाचं, कुणावर, कसं आणि कधी जडतं ह्याचे तर कोणतेही नियम नसतात.
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात . प्रकाश सर्वांनाच दिसतो. प्रकाशात अनेकांचं आयुष्य उजळून निघतं पण ज्यांच्या नशीबात त्या प्रकाशा मागचा अंधार असतो त्यांचं काय ?
नायिकेच्या भविष्यातही असंच काहीसं आहे. आजवर प्रकाशात उजळून निघायची स्वप्न पाहणार्या तिला प्रत्यक्षात मात्र प्रकाशाच्या दुसरी बाजूचं स्थान मिळालेलं आहे ….

"यत्र वह्नी तत्र धूमः" ह्या न्यायानुसार जिथे आग तिथे धूर असतोच. त्या आगीमुळे निर्माण झालेला प्रकाश तिच्या नशीबात नाही तर तिच्या वाट्याला आला आहे धूर आणि त्या धूरामुळे ती गुदमरत आहे … त्या धगीची झळ बसून तिचं हृदय पोळून निघत आहे .
आज ती स्वप्नातून सत्यात आली आहे . पण बिचारीची असहाय्यता पाहा की हे सत्य सुद्धा स्वप्नच असावं म्हणून ती मनोमन करूणा भाकत आहे . सत्याला सामोरं जाण्यासाठी स्वतःच्याच मनाला कसंबसं तयार करते आहे.

"ये रोशनी के साथ क्यूं
धुआँ उठा चिराग से
ये ख़्वाब देखती हूँ मैं
के जग पड़ी हूँ ख़्वाब से"...

तसं पाहायचं तर नायकालाही नायिकेच्या आपल्यावरच्या प्रेमाची अंधूक का होईना चाहुल लागलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही . पण दोघांपैकी कोणीही अजून तशी कबूली दिली नव्हती.
अशातच नायकाचे लग्न कोणा दुसरीशीच ठरते. आणि म्हणूनच नायिकेची तडफड होत आहे .
त्यात भर म्हणून की काय नायकाचे अभिनंदन करायची जबाबदारी नायिकेलाच सर्वांसमोर पार पाडायची आहे.
आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती जेव्हा दुसर्या कोणाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनणार असल्याचं कळतं तेव्हा काय करावं ? आपलं आयुष्य उध्वस्त झालं म्हणून दुःख करावं की त्याचं आयुष्य नव्याने सुरू होणार म्हणून आनंद साजरा करावा ?
कसं वाटत असेल अशावेळी ? आत खळबळ माजलेली असताना वरकरणी शांत राहाणं किती अवघड आहे.

“मुबारकें तुम्हें के तुम
किसीके नूर हो गए
किसीके इतने पास हो
के सबसे दूर हो गए” …..

तिचं आयुष्य उजळवून टाकणारा तो आता दुसर्याच कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश बनून जाणार आहे. आणि तिच्या आयुष्यात मात्र कायमचा काळाकुट्ट काळोखच उरणार आहे .
नायकाला ह्यामुळे काही फरक पडेल किंवा नाही हेही नायिकेला माहीत नाहिये. कदाचित तो त्याच्या त्या नवीन सुंदर जगात कायमचा रमूनही जाईल .
पण नायिकेचं मात्र अवघं आयुष्य त्याने व्यापून टाकलेलं आहे. त्याच्या शिवायचं स्वतःचं अस्तित्वही तिला नकोसं वाटत आहे. आपलं पुढचं सारं आयुष्य एकट्याने घालवताना ही आजच्या कातरवेळची आठवण तिच्या मनात कायम ताजी राहणार आहे

“किसीका प्यार लेके तुम
नया जहाँ बसाओगे
ये शाम जब भी आएगी
तुम हमको याद आओगे”...

संपूर्ण गाण्यात मीनाकुमारीच्या डोळ्यांमधील वेदना, ओठांवर उसने हसू आणत मनातली कालवाकालव लपवणे, हाताच्या बोटांतून जाणवणारी अस्वस्थता ह्या सर्वातून तिच्या मनातली घालमेल अतिशय अचूक रित्या व्यक्त झाली आहे.

हा दर्द गहीरा करणारा लताचा आवाज आणि तो दर्द पडद्यावर साकारणारी साक्षात ट्रॅजेडी क्वीन …. आज इतक्या वर्षांनंतरही सारं काही तितकच चटका लावतं.

लताचा आवाज आणि मीना कुमारीचा अभिनय ह्या दुग्धशर्करा योगामुळे अजरामर झालेले “दिल अपना और प्रीत पराई” ह्या १९६० सालच्या चित्रपटातील हे एक अविस्मरणीय गीत.

ह्या गाण्यातील आणखी एक कायम लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे साईड अॅक्ट्रेस शम्मीचा तो “माझ्यापासून काहीच लपलेलं नाही” हे सांगणारा तिरकस खट्याळ कटाक्ष.

गाण्याच्या सुरूवातीचे, अंतर्याच्या मधले आणि शेवटच्या कडव्यावेळचे संगीत अतिशय सुरेख. गाण्यात केलेला कोरसचा वापर तर लाजवाब. एकाच वेळी आनंदी सूर असलेला आणि तरीही हुरहुर लावणारा असा हा विलक्षण कोरस कायमचा लक्षात राहतो. सोबत पाश्चात्य पद्धतीने केलेला गीटारचा वापरही अप्रतिम.


© नयना पिकळे

🌸🌺🌹 बसंत है आया रंगीला 🌷🌻🥀

  कडाक्याच्या थंडीत डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन झोपलं असताना अचानक एके दिवशी पाहटे कोकिळेची कुहूकुहू ऐकून जाग येते आणि एका क्षणात मनावरची मरगळ...