'बाईपणभारीदेवा' हा चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच प्रचंड hype तयार झालेला आणि रिलीज होऊन 2-3 दिवसही झालेले नाहीत आणि तरी अनेकांनी ह्यावर उलट सुलट लेखही लिहून झालेत .
त्यामुळे मी परत काहीही नव्याने लिहिण्यासारखं नाहिये पण राहावत नाही म्हणून थोडं मनातलं.
कथा आहे सहा सख्ख्या बहिणींची. काळाच्या ओघात आपापल्या संसारात, कुटुंबाच्या जबाबदार्यांमध्ये गुंतलेल्या आणि एकमेकींपासून थोड्या दुरावलेल्या.
त्यांना एकत्र आणणारं सूत्र आहे मंगळागौर. बस बाकी पुढची धम्माल चित्रपटातच अनुभवण्यासारखी आहे.
सख्ख्या बहिणींमधील तेढ, रुसवे फुगवे, गैरसमज, जळूपणा, इगो आणि त्याचबरोबर तितकीच माया, समंजसपणा, ओढ हे सगळं सगळं नेहमीच्या आपल्या आयुष्यातलंच आहे.
त्यांचा एकमेकींबद्दलचा राग, द्वेष, तिरस्कार, आसुया दाखवणारे प्रसंगही अगदी खरेखुरे आणि पटणारे आहेत. आणि त्यांच्यातील तेढ सुटणारे प्रसंग ज्या कल्पकतेने दिग्दर्शित केलेत ते तर खूपच आवडले.
घराघरात दिसणारं तेच इथे पडद्यावर पाहायला मिळतं. पण अत्यंत प्रभावीपणे.
चित्रपट थेट ह्रदयाला भिडतो. चित्रपटाचे संवाद आणि दिग्दर्शन एक नंबर.
चित्रपटाच्या सुरुवातीला नियमानुसार इतर चित्रपटां प्रमाणेच disclaimer येतो कि ह्यातील पात्र व प्रसंग काल्पनिक असून ह्यांचा प्रत्यक्ष कोणाशीही संबंध नाही .
पण मला तरी ह्यातला प्रत्येक प्रसंग खराखुरा वाटला . आजवरच्या आयुष्यात ह्यातील प्रत्येक गोष्ट कमीजास्त प्रमाणात प्रत्यक्ष अनुभवलेली किंवा ऐकलेली आहे.
ह्यातील सगळीच पात्र आपल्या आजुबाजूला वावरणारी पात्र आहेत. ह्यतली अनेक पात्र मी माझ्या आयुष्यात पाहिलेली आहेत आणि ती चित्रपटातील कॅरेक्टर्सपेक्षाही जास्त विक्षिप्त आहेत ह्यात जराही अतिशयोक्ति नाही.
तेव्हा हा चित्रपट पाहाच. अजिबात चुकवू नका.
© नयना पिकळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा